Wednesday, July 15, 2009

शेजारी येती घरा

Prahhar Mumbai . Thursday . 16 July 2009 . Front Page Story

गेले दोन दिवस ख-या अर्थानं पाऊस कोसळतोय.. अशा अतिवृष्टीत आपलीही जिथं तारांबळ उडते तिथं मुक्या जिवांचं तर पार भानच हरवतं. बिळांमध्ये पाणी शिरतं, कुठे काटक्यांचं घरटं मोडून पडतं, कुठे आसरा देणारं झाडच कोसळतं आणि मग हे मुके जीव बिचारे वाट फुटेल तिथं आश्रय शोधू लागतात. ठाण्यात तर एकदा एक कोल्होबाही पाहुणे म्हणून उगवले होते. सिमेंटच्या जंगलाच्या कडेनंच नांदणारे हे ‘शेजारी’ आगंतुकपणे ‘पाहुणे’ बनून घरात शिरल्यावर आपलीही गडबड उडते. त्यातही साप वगैरे दिसल्यावर तर लगेच लाठय़ा-काठय़ा बाहेर पडतात, एक जीव हकनाक बळी पडतो. हे होऊ नये, आपलीही धावपळ उडू नये आणि ‘शेजारधर्मा’चं पालन व्हावं, या पाहुण्यांचीही योग्य व्यवस्था लागावी, काळजी घेतली जावी यासाठी ‘प्लँट अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी, मुंबई’चे सचिव सुनीश सुब्रमण्यम यांनी केलेलं हे मार्गदर्शन..


साप

भारतात आढळणारे मण्यार, घोणस, नाग, फुरसं असे मोजके विषारी साप सोडले, तर बहुतांशी साप बिनविषारी आहेत. मात्र नेमक्या विषारी सापांच्या जाती मुंबई-ठाण्याच्या आसपास आढळतात. खासकरून पावसाळ्याच्या दिवसांत साप बाहेर येतात आणि खाडीकिनारी किंवा जंगल परिसरातील सोसायटय़ांच्या आवारात शिरतात. गेल्या आठ-दहा वर्षामध्ये साप मारू नयेत यासाठी सर्पमित्रांनी चांगलीच जनजागृती केली आहे. त्यामुळे दिसला साप की मार, ही मानसिकता बदलू लागली आहे. साप दिसताक्षणीच ओळखीतल्या सर्पमित्राला तात्काळ फोन जातात. सर्पमित्रही सामाजिक बांधीलकीच्या नात्यातून साप ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी धाव घेतो. परंतु त्यांच्या येण्यापूर्वी साप भलतीकडेच गेलेला असतो. मग सर्पमित्र आणि त्याला दूरध्वनी करणाऱ्या नागरिकाचे प्रयत्न निष्फळ ठरतात.


सोसायटी किंवा परिसरात साप दिसल्यानंतर तो कुठे जात आहे, यावर लक्ष ठेवणं अत्यावश्यक असतं. पावसाळ्याच्या दिवसांत सोसायटीच्या आवारात येणारा साप झाडाझुडपांत दडून राहू शकतो. त्यामुळे खालची जमीन दिसेल अशा पद्धतीनं झाडांची नियमित छाटणी करावी, त्याचप्रमाणे आवारातील कचरा, अडगळीचं सामान पूर्णत: काढून टाकावं. असं करण्यास टाळाटाळ केल्यास सापाला आश्रयस्थान मिळतं. तळमजल्यावरच्या घरातलव्हबर्डसारख्या पक्ष्यांचे पिंजरे असतील तर या पक्ष्यांना खाण्यासाठी साप येतात, तसेच दुस-या-तिसऱ्या मजल्यावरील घरातही साप आल्याच्या घटना आहेत. त्याचंही असंच कारण आहे. घरात येणाऱ्या झाडाच्या फांदीचा आधार घेऊन साप घरात येऊ शकतो. त्यासाठी अशा झाडांच्या फांद्यांची वेळीच छाटणी करणं गरजेचं आहे.

पक्षी

वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईतल्या झाडांची संख्या रोडावली आहे. वड, पिंपळ, औदुंबर यांसारखी मजबूत झाडं कमी होऊन त्या ठिकाणी गुलमोहर-बदाम या झाडांसारख्या पोकळ झाडांची मांदियाळी दिसून येते. मात्र पक्ष्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागाच नाही. सोसाटय़ाच्या वादळी वाऱ्यात, पावसात घरटी पडून पक्ष्यांची पिल्लं रस्त्यांवर आलेली दिसतात. कधी कधी वादळी पावसाच्या तडाख्यात सापडलेली घार वा घुबड असे मोठे पक्षी रस्त्यांवर किंवा इमारतीच्या आवारात जखमी अवस्थेत पडलेले आढळतात. या पक्ष्यांना पकडायला गेलो तर हे पक्षी चावतील या भीतीनं नागरिक घाबरून लांब पळतात. परंतु घाबरून जाता त्यांच्या अंगावर कापड टाकून, त्यांना पकडून लहान लाकडी पेटीत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावं. तसेच पक्षीमित्रांच्या मदतीनं त्यांची रवानगी वनखात्याकडे करावी. काही वेळा लहान मुलं हौसेखातर त्यांना पाळायला नेतात. परंतु पाळण्यासाठी नेलेला पक्षी दुर्मीळ जातीतला असला, तरी त्याचं महत्त्व मुलांना समजत नाही. परिणामी त्याची योग्य देखभाल झाली नाही की तो मरतो.

कासव

मुसळधार पाऊस पडल्यावर नदी-नाले भरून वाहतात. तेव्हा यातील अनेक जलजीव शहरातील गटाराच्या वाहत्या पाण्यात आढळतात. यात कासव प्रामुख्यानं दिसतं. तलावात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात बरेचदा कासव मिळतं. ज्यांना कासवाचं महत्त्व माहिती आहे, ते त्याला लगेच पाण्याच्या प्रवाहात सोडून देतात. कासव घरात पाळणं वन्यप्राणी कायद्यानुसार चुकीचं आहे. मात्र फेंगशुईसारख्या अंधश्रद्धेमुळे किंवा घरात कासव ठेवणं भाग्याचं असतं, असं मानून वाहत्या गटारातून, काठोकाठ भरलेल्या विहिरीतून बाहेर आलेली कासवं पाळली जातात. चुकून असं मिळालेलं कासव घरात ठेवता लगेचच वनखात्याकडे अथवा प्राणिमित्रांकडे सुपूर्द करावं. जेणेकरून त्यांना पुन्हा निसर्गाच्या प्रवाहात सोडता येईल.


No comments: