
7 Jul 2009
पावसाच्या जबरदस्त दणक्याने उघड्यावर आलेल्या प्राणी-पक्ष्यांना सोडवण्याचं काम प्राणीप्रेमी संघटनांनी युद्धपातळीवर हाती घेतलंय.
वाट पाहायला लावून धुंवाधार बरसलेल्या पावसाने प्राण्यांचंही आयुष्य विस्कळीत केलं. अर्थात, याला पावसासोबत माणूसही जबाबदार आहे. पावसाने झाडांच्या फांद्या तुटू नयेत यासाठी त्या ट्रीम करताना, त्यावरची घरटीही खाली टाकणाऱ्या माणसांच्या बेफिकीर वृत्तीमुळे अनेक पक्ष्यांच्या पिलांना जीव गमावावे लागले आहेत, तर कित्येक पक्षी जखमी झाले आहेत. या पक्ष्यांना तसंच पाण्याने बिळं भरल्यानंतर बाहेर आलेल्या सापांना वाचवण्याचं काम प्राणीप्रेमी संघटना करत आहेत.
पावसाळ्याच्या सुरुवातीला पक्षी अंडी घालतात. पावसाळ्यात येणारं गवत तसंच किडामुंगीसारखं भरपूर खाद्य उपलब्ध होत असल्याने निसर्गाची ती योजना असते. मात्र, पिल्लं बाहेर येण्याचा काळ आणि पावसाने झोडपण्याचा काळ एकत्र आल्याने अनेक पिल्लांना जीव गमवावा लागतो. कोकीळ, खार, तित्तर आणि अशा अनेक पक्ष्यांची सुटका नुकतीच प्लॅण्ट््स अॅण्ड अॅनिमल वेल्फअर सोसायटीने (पॉज) केली आहे. यासोबत भाभा अॅटोमिक रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे बीएआरसी परिसर, भांडूप, मुलुंड या भागातून दहा सापांची सुटका करण्यात आली आहे. बिळात पाणी गेल्याने हे साप लपण्याची जागा शोधत परिसरात फिरत होते. यात चार नाग, चार घोणस आणि दोन धामण यांचा समावेश आहे. रसेल वायपर हे आशियातल्या सर्वात विषारी सापांपैकी आहेत. पवईच्या गोपाल शर्मा स्कूलमध्ये हे साप सापडले. कॉलेजमधली मुलं त्यांच्याशी खेळत होती. मात्र हे प्राणघातक होऊ शकलं असतं, असं 'पॉज'चे सेक्रेटरी सुनिश सुब्रमण्यम यांनी सांगितलं. याशिवाय भांडूप परिसरातून दोन सॉफ्ट शेल कासवांनाही सोडवण्यात आले आहे. आज पुन्हा 'बीएआरसी'मधून आणखी दोन सापांची सुटका करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment